‘खाऊ का?’ ह्या सत्राचा आज अंतिम लेख कुठल्या विषयावर लिहायचा हा मोठा प्रश्न पडला होता. आधी विचार केला कि आज मधुमेह, अतिरक्तदाब, अस्थमा अश्या कुठल्या विषयावर लिहिते. मग मनात आलं कि हे कुठलेच विकार एकमेकांपासून विभक्त नाहीयेत. मधुमेहाचच बघाल तर त्याचा लठ्ठ्पणा, अतिरक्तदाब, धुम्रपान, स्नायू दुखणे, संधिवात, डोळ्यांचे विकार, जखम भरून न येणे, अर्धांगवात ई. बऱ्याच विकारांशी संबंध असतो. असं असताना, आज मांडलेल्या प्रश्नांचा पुढच्या लेखात मला समाधान करता येणार नसल्यामुळे मग ठरवलं कि आज तुम्ही वाचकांनी मला ईमेलद्वारे वारंवार विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर आज देऊया.
मला सगळ्यात जास्त अश्या प्रकारची ईमेल येतात – ‘मी तुमचा ‘सामना’ मधे लेख वाचतो/वाचते. मी स्त्री/पुरुष, वय: ___, उंची: ____. मला डाएट सांगा.’ आता, फक्त एवढीच माहिती सांगून डाएट मागणं म्हणजे एखाद्या डॉक्टर ला एवढंच सांगून त्याच्याकडे ‘आता मला औषध द्या’ असं म्हणण्या सारखं असतं. आहो, डाएट कशासाठी हवंय, काय विकार आहे, तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयी काय आहेत, व्यायाम किती (किंवा किती नाही!), व्यवसाय काय, घरचं जेवता कि बाहेरचं, शाकाहारी/ मांसाहारी ई. बरीच एवढी सगळी माहिती लागते. माझ्या कुठल्याही क्लायन्ट ची पहिली भेट (मुलाखत) कमीतकमी एक तास चालते. कारण मी जो सल्ला देणार त्याचा त्यांच्या रोजच्या जीवनातल्या सगळ्यात महत्वाच्या आणि आवडीच्या विषयावर परिणाम होणार असतो. तर, तुम्ही पण मला जरूर ईमेल पाठवा आणि मी सगळ्यांचं उत्तर पण देईन पण फक्त हे लक्षात घ्या कि डाएट सांगायला मला काय काय माहिती लागेल. आणि हो, ह्यात ही बरीच मंडळी ‘फुकट ते पौष्टिक’ मानून बसलेले असतात-तो विषय तर आणि निराळा. असो.
दुसरं सातत्याने विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘तुम्ही पारंपारिक जेवण जेवा असं म्हणता, पण ते नक्की काय असतं?’ ह्या प्रश्नाचं सगळ्यांना अनुकूळ असं एक उत्तरच नाहीये मुळी. शाळेत असताना तुम्ही डबा न्यायचात? त्यात कुठल्याही दोन घरची बटाटा भाजी एका पद्धतीने बनवलेली किंवा एका चवीची असायची का? कोणी नारळ घालणार, कोणी कांदा टोमाटो, कोणी नुसती परतून करणार तर कोणी रस्सा भाजी. एवढे वेगळे प्रकार आपल्या मराठी घरांमध्येच असतात. तर मग, डोश्यात घालतात त्या बटाटा भाजी चा तर विषयच वेगळा. तुमच्या साठी उपयुक्त पारंपारिक जेवण म्हणजे जे खाऊन तुमचे आई वडील मोठे झाले ते. पण एक लक्षात घ्या कि जेवढ्या पोळ्या किंवा भात तुमचे वडील खायचे तेवढंच तुम्ही खाता कामा नाही कारण तेवढे परिश्रम आणि अंगमेहनत आता आपण घेत नाही. तसंच मिष्टान्नाच पण असतं- पूर्वी जे चकली लाडू चिवडा करंजी फक्त सणासुदीला होत होते ते आता वरचेवर घरी केलं/आणलं जातं आणि बेहिशोब खाललं जातं. तसं न करता, पूर्वी च्या पद्धती प्रमाणेच हे पदार्थ त्या त्या सणालाच खालले पाहिजेत.
दमणूक म्हणजे व्यायाम का? नाही. नुसतं डाएट करून वजन कमी करता येतं का? येतं, पण मी तसं करायला कधीच सांगत नाही. कारण व्यायाम हा रोजच्या जेवणा एवढाच महत्वाचा असतो. व्यायामाला सुट्टी देऊन चालत नाही. आणि हो, दिवसभर फिरतीच काम, उभराहून काम, घरकाम ह्यात जरी खूप वेळ जाऊन दिवसाच्या शेवटी प्रचंड दमायला होत असेल तरी तो व्यायाम नसतो. त्यामुळे नुसतं डाएट आणि बाकी घरकाम किंवा बैठी नोकरी करून वजन कमी होण्याची किंवा परिश्रमाने कमी केलेले वजन टिकून राहण्याची अपेक्षा ठेवू नये.
आणि हो, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे उपासमार न करून घेणे. अति जेवण झाल्यावर, संध्याकाळच्या पार्टी च्या आधी दिवसभर उपाशी राहणे, मधुमेही व्यक्तींनी ‘आज गोड खाणं झालंय तर आता पुढचे तीन दिवस कमी जेवणे’ असे सर्व प्रकार तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. चांगल्या आरोग्यासाठी, आहार आणि व्यायाम हे रोजच्या रोज सांभाळावं लागतं; त्यात हप्तेवारी चालत नाही.
चला तर मग, आता निरोप घेते. असंच आपल्या आणि आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, स्वस्थ खा स्वस्थ रहा!
thank you amita for this useful information.